
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होणार असून काँग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केलेला असून महाराष्ट्रात जेव्हा ही यात्रा येईल तेव्हा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत असेही सांगितलेले आहे.
बारामती येथे 23 तारखेला पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर ही पदयात्रा सध्या सुरू असून महाराष्ट्रात आल्यानंतर आम्ही देखील त्यात सहभागी होणार आहोत तसेच सोबत इतरही राष्ट्रवादीचे नेते या यात्रेत सहभागी होतील असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौर्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘ शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी जात असेल तर त्या विषयी शंका कशासाठी घ्यायची ? केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करावी आणि त्यातून जर शेतकऱ्यांचा फायदा झाला तर ही चांगली गोष्ट आहे ‘, असे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे.